
ठाणे – कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्र… समुद्राच्या लाटा अंगावर झेलत अत्यंत खडतर असे सागरी अंतर ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या १९ जलतरणपटूंनी यशस्वीपणे पार केले. या सर्व जलतरणपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री दुर्गा माता कला क्रिडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी, कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेने नुकतेच विजयदुर्ग येथे या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. १५ कि.मी. व ३० कि.मी. अशा दोन गटात ही स्पर्धा होती.
१५ किमी स्पर्धेत मुलींमध्ये आयुषी आखाडे – प्रथम क्रमांक, महेक तन्ना – चतुर्थ क्रमांक पटकाविला तर गार्गी राऊत, समीप्ता वाव्हळ, आर्या देवस्थळी, अन्वयी विचारे, समिधा मोरे, ध्रीती कोळी यांनी यशस्वीरित्या १५ किमी खडतर अंतर पोहून पार केले. तर गार्गी भरणुके हिने १४ किमी अंतर पार केले. १५ किमी स्पर्धेत मुलांमध्ये समर्थ भिलारे, विवान गुरसळे, सिद्ध मुपेनिटी यांनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले.
३० किमी स्पर्धेत तृणांश गंद्रे – तृतीय क्रमांक, आरीत जिंदल – चतुर्थ क्रमांक, रुद्र निसार -पाचवा क्रमांक प्राप्त केला तर रेयांश खामकर, नक्ष निसार, सुयश हिंदळेकर, ओजस मोरे, यांनी हे खडतर अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले.
हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित सराव करीत असून प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचे जलतरणाचे धडे घेत आहेत. या सर्व जलतरणपटूंचे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, उपायुक्त मीनल पालांडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच ठाणेकरांकडूनही या जलतरणपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.