
महानगर गॅसने फोडलेल्या जलवाहिनीतून दररोज 40 दशलक्ष लिटर्सची पाणी गळती
ठाणे – महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती. ही जलवाहिनी दुरूस्त केल्याचा दावा ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र, हा दावा करून ठामपाने ठाणेकरांची फसवणूक केली आहे. आताही दररोज 40 दशलक्ष लीटर पाणी गळती होत आहे. या प्रकरणी महानगर गॅसचे कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केली.
१००० मी.मी. व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाइपलाइन भिवंडी बायपास जवळ रांजनोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या १००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीजवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचे काम सुरू होते. या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडले असून मोठी गळती सुरू झाली होती. ही जलवाहिनी दुरूस्त केल्याचा दावा ठामपाचे अधिकारी करीत असले तरी हजारो लिटर्स पाणी रोज वाया जात आहे. याबाबत प्रधान यांनी पालिका यंत्रणांचे वाभाडे काढले. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर , युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, ज्ञानेश्वर राजपंखे आदी उपस्थित होते.
मनोज प्रधान म्हणाले की, ठाणे महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी पिसे येथील एक हजार मी.मी. व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे दुरुस्त झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. पण, हा दावा पूर्णतः खोटा आहे. कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे हे वैयक्तिक फायद्यासाठी ठाणे महापालिकेची दिशाभूल करून महानगर गॅसच्या कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत. ते अर्थपूर्ण व्यवहार करून ठाणे महापालिकेचा महसूलही बुडवित आहेत. मात्र, आयुक्त सौरव राव, पाणी खात्याचे प्रमुख विनोद पवार हे पांडे यांच्यावर काहीही कारवाई करीत नाहीत.ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे.
दरम्यान, महानगर गॅसच्या ठेकेदाराने एवढी मोठी जलवाहिनी फोडल्यानंतरही ठाणे महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात येत नाही. यामागे काय कारण आहे, हे थेट आयुक्तांनीच जाहीर करावे; संबधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, संबधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे; अन्यथा, पाणी खात्यातील अधिकाऱ्यांना दालनाबाहेर पडू देणार नाही, असा इशाराही प्रधान यांनी दिला आहे.
पालिका आयुक्तांना आव्हान
या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून पाणीचोरी होत आहे. याबाबत आपण पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. मात्र, ठोस कारवाई झालेली नाही. आजही भूमिगत वाहिन्यांमधून पाणीचोरी होत आहे. आपण पालिका आयुक्तांना जाहीर आव्हान देतो की, त्यांनी माझ्यासोबत घटनास्थळी यावे. मी ही पाणी चोरी त्यांच्यासमोरच उघडकीस आणतो, असेही मनोज प्रधान यांनी सांगितले.