
समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांचे प्रतिपादन
बार्टीचा वर्धापन दिन साजरा
ठाणे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या मूल्यांचा जनमाणसात प्रचार-प्रसार करून वंचित,उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत बार्टीचे योगदान प्रशंसनीय असल्याचे मत समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ- मुंडे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेचा 47 वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विभागप्रमुख अनिल कारंडे, रवींद्र कदम, शुभांगी पाटील, डॉ बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना मुंढे म्हणाल्या, बार्टी ही संस्था अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे.त्याचा फायदा अनेकांना होत आहे.
या प्रसंगी महासंचालक वारे म्हणाले, की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महापुरुष होते. त्यांनी संविधान निर्मितीसाठी मोठा संघर्ष केला, त्यामुळेच या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान मिळाले, त्यामुळेच या देशातील कोट्यावधी लोकांचा उधार झाला. त्यांचे विचार आपण आचरणात आणावे. त्यांच्या नावाने ही संस्था उभी आहे. या संस्थेचा लौकिक सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी वाढवावा ,असे आवाहनही त्यांनी केले.
संस्थेच्या विविध योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या वेळी वर्धापन दिना निमित्ताने घेण्यात आलेल्या क्रीडा -सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बार्टीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात बुद्ध -भीमगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार व सेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ बबन जोगदंड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले.